आत्ता सर्व प्रकारच्या मराठी ऑडिओ कथा फ्री मध्ये... तुमच्या आवडत्या वेबसाईटवर www.FMmarathi.in अहंकाराचा वारा न लागो मनाला‌ ... Ahankaracha Vara na lago manala | Audiostory mp3 free Marathi Audiobook Fmmarathi.in

अहंकाराचा वारा न लागो मनाला‌ ... Ahankaracha Vara na lago manala | Audiostory mp3 free Marathi Audiobook Fmmarathi.in

 
www.FMmarathi.in
‘ अहंकाराचा वारा न लागो मनाला‌’

‘अहंकार’ हा माणसाचा फार मोठा शत्रू. प्रत्येक व्यक्ती अहंकारव्याप्त असते. कुणाला कर्तृत्वाचा अहंवार असतो. तो येता-जाता साऱ्यांना सांगतो, ‘मी शून्यातून जग उभ केलं आहे.’ अरे तू खरंच विश्वमित्र आहेस का? नवीन जग बनविणारा? कुणाला रूपाचा, कुणाला ज्ञानाचा, कुणाला पदाचा तर कुणाला सत्तेचा अहंकार. साध्या शब्दात सांगता येईल की अहंकार म्हणजे मद, मस्ती, माज. अहंकारी माणसाजवळ विनम्रता नसते. मी म्हणजे मीच फक्त, हेच त्याच्या नसानसात भरलेलं असतं..

    रावण स्वतःच्या अहंकारामुळे संपला. वास्तविक तो ब्रह्मज्ञानी पण अहंकारामुळे दानव झाला. पुराणात आणखी एक कथा आहे. भस्मासुराची. भस्मासुराने शंकराची तपश्चर्या करून ‘ज्याच्या डोक्यावर हात ठेवील त्याच भस्म होईल’ असा वर मिळविला. त्या वराने त्याला एवढा अहंकार झाला की प्रत्यक्ष वर देणाऱ्यालाच तो भस्म करायला निघाला. मग विष्णूने मोहिती रूपात त्याला नष्ट केले.

नामदेवांना भक्तीचा तर चांगदेवांना योगविद्येचा अहंकार झाला. मुक्ताईने त्यांचा अहंकार मार्मिकपणे दूर केला. मी भक्त आहे, मी संत आहे ही जाणीवही अहंकाराचा भाग आहे. फारतर त्याला सात्त्विक अहंकार म्हणता येईल. अहंकाराची जाणीव त्या व्यक्तीला बऱ्याचदा नसते. पण इतरांना ती जाणवते.

 एकदा एक राजा आणि या राजाचा गुरू जंगलात फिरत होते. राज्याची हालहवाल कशी आहे, असे गुरुदेवांनी राजाला विचारलं. ‘राज्यात सर्व चांगलं आहे, रयतेच्या सुखासाठी आम्ही कायम तत्पर असतो,’ असं राजा म्हणाला. गुरुदेवांना या वाक्यात ‘अहं’चा वास आला. तो दूर करण्यासाठी त्यांनी वाटेतील छोटासा दगड उचलला. त्या दगडाखाली एक खोलगट भागात पाणी होतं, त्यात बेडकी होती. दगड उचलताच तिने टुणकन उडी मारली. ते पाहून गुरुदेव म्हणाले, या बेडकीचीही तुम्ही छान व्यवस्था केलीत. या वाक्याने राजा वरमला. त्याच्या वाक्यातून आलेला अहंकाराचा दर्प गुरुदेवांनी कुशलतेने आणि अलगद दूर केला.

 आपला अहंकार दूर करणे ही गोष्ट कठीण आहे पण अशक्य नाही. त्यासाठी मनोनिग्रह आणि साधना हवी. सर्वांना हे जमेल असं नाही. अहंकार प्रगतीच्या आड येतो. अहंकारी व्यक्ती समष्टीपासून आपोआप दूर जाते. ती इतरांची पर्वा करीत नाही. लोक दूर पळतात. जेव्हा अहंकार कमी होतो, त्यावेळी त्या व्यक्तीस सोबत कुणीतरी हवे असं वाटू लागतं. त्यावेळी त्याच्यासोबत एकटेपणाचं पिशाच्च असतं.

  *अहंकारात अहं म्हणजे मी प्रभावी असतो. व्यक्ती स्व-भोवती फिरते तेव्हा अहंकार पोसला जातो. हा ‘मी’ इतरांना तुच्छ मानू लागतो. एकटा पडतो. माणूस समाजनिष्ठ प्राणी आहे. एकटा जगू शकत नाही. ‘आम्हाला कोणाची गरज नाही. आमच्याजवळ सारे आहे’ असा अहंकार बाळगणारी माणसं विकृतीच्या जवळ गेलेली असतात. ‘मी’चं आपण होणं म्हणजे अहंकाराला थोडंसं दूर करणं. अहंकारावर विजय मिळवायचा असेल तर रामकर्ता हा जप सतत करावा. मी कोणीच नाही ही भावना असावी. ‘अहं’चा त्याग केला की आपण मानवतेच्या मार्गावरून जातो.‘अहंकाराचा वारा न लागो मनाला‌’ असं समाजावलं की जगणं उज्ज्वल होतं ...*


🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

www.FMmarathi.in
Thanks